9 ऑगस्ट म्हटले की आपल्याला आठवते १९४२ ची ‘चले जाव’ चळवळ आणि मनात फुलते स्वाभिमानाची ज्योत. क्रांती दिनाच्या याच शुभमुहूर्तावर अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजोन्नती मध्यवर्ती महिला मंडळाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा‘ अंतर्गत ‘तिरंगा’ थीम घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
ऑनलाईन आणि ऑफलाइन कार्यक्रम
ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
ऑनलाइन कार्यक्रमामध्ये रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, पेंटिंग विथ स्लोगन स्पर्धा, कविता स्पर्धा या स्पर्धा आयजित केल्या. तसेच सेल्फी विथ तिरंगा, बांगडीतून कलाकृती हेही उपक्रमही घेतले.
ऑफलाईन कार्यक्रमामध्ये स्थानिक पातळीवर रॅली काढणे,आश्रमात जाऊन स्वातंत्र्यदिन साजरा करणे, मुलांसाठी विविध उपयुक्त देशभक्तीपर कार्यक्रम घेणे असे विविध कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात घेतले गेले. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन ऑनलाइन कार्यशाळेत केले गेले.
महिलांच्या संघटन शक्तीचा प्रत्यय
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांच्या संघटन शक्तीचा प्रत्यय येईल अशा प्रकारच्या स्पर्धांचे नियोजन केले होते. आणि महिला भगिनींनी त्यात सहभागी होऊन आपल्या संगठन कौशल्याचा प्रत्यय दिला.
जिल्हानिहाय स्पर्धा घेऊन त्यातील क्रमांक राज्यपातळीवर पाठवून पुन्हा राज्यपातळीवरील नंबर काढणे हे सर्व नियोजनबध्द कार्य महिला भगिनी यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पडले आणि ‘हर घर तिरंगा’ राज्यस्तरीय निकाल जाहीर झाला.
या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी असलेल्या महिला भगिनींचे अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजोन्नती मध्यवर्ती महिला मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.