fbpx

Veer Savarkar Setu : वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव

Veer Savarkar Setu : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला (Bandra Versova Sea Link) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ (Veer Savarkar Setu) असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती महाराष्ट्र सदनात साजरी

महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती प्रथमच साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले, ही अभिमानास्पद बाब आहे. त्या ऐतिहासिक सोहळ्याचे व क्षणांचे साक्षीदार होता आले. लोकशाहीच्या पवित्र मंदिराची, नव्या संसद भवनाची वास्तू स्थापना व लोकार्पण विक्रमी वेळेत झाले आहे, ही गौरवास्पद बाब आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

स्वातंत्र्यवीरांचे श्रेष्ठत्व, त्याग, बलिदान, देशभक्ती ही सर्वश्रुत आहे. या देशाचे, राज्याचे व मातीचे सुदैव स्वा. सावरकर यांच्यासारखे क्रांतिकारक येथे जन्माला आले. प्रखर देशभक्तीमुळे त्यांची इंग्रजांमध्ये दहशत होती. संपूर्ण सावरकर समजून घेणं अशक्य व अवघड आहे, परंतु त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास हिंदुत्वाचा सुगंध आपल्याला नक्कीच येईल. स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते, महान क्रांतिकारक, सक्रिय समाजसुधारक अशा विविधांगाने त्यांची ओळख होती. ते प्रतिभावंत साहित्यिक, कवी होते तसेच अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते आणि भाषिक गुलामगिरी दूर करण्यासाठी इंग्रजीला त्यांनी अनेक पर्यायी शब्द उपलब्ध करून दिले, असे म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वा. सावरकरांना अभिवादन केले.

हे ही वाचा : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चा टीझर प्रदर्शित !

Veer Savarkar Setu : उपमुख्यमंत्र्यांनी मानले आभार

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून, मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ (Veer Savarkar Setu) असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या घोषणेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला सावरकरांचे नाव देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून 16 मार्च 2023 रोजी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली, याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. आपल्या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण सदोदित नव्या पिढीला होत राहील आणि त्यातून उद्याच्या समर्थ भारतासाठी गौरवशाली पिढ्यांचे निर्माण होईल, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *