मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी १० सप्टेंबरला मनसेकडून ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ मोहीम राबविण्यात आली.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मुंबईतील चौपाटीवर भाविकांनी गणरायाचे विसर्जन करण्यासाठी गर्दी केली होती. परंतु, ओहोटीमुळे गणेश मूर्ती समुद्रकिनाऱ्यावर येऊन पडलेल्या आढळल्या. मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी १० सप्टेंबरला मनसेकडून ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेही सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे, पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसंच महाविद्यालयीन तरुण-तरुणीसुद्धा समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.
हे ही वाचा: कविता – गणपती बाप्पाचे आगमन
मनसेची स्वच्छता मोहीम
अमित ठाकरेंनी दादर समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य उचलून किनारा स्वच्छ केला. या मोहिमेत मनसेच्या कार्यकर्त्यांसह अनेक पर्यावरणप्रेमी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीही सहभागी झाले होते. या मोहिमेअंतर्गत किनाऱ्यावर आलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य गोळा करून ते स्थानिक प्रशासनाकडे सोपविण्यात आले. मनसे कडून मुंबईत गिरगाव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा येथे, रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड तर रत्नागिरीत मांडवी येथेही ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात आली.
समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी अभियान
गणपती विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष पुढे येताना दिसत आहेत. दिव्याज फाउंडेशनच्यावतीने गणेश विसर्जनानंतर जुहू बिच स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस , अभिनेते अनुपम खेर , अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्यासह विविध भाजप नेत्यानी उपस्थिती दर्शवत जुहू बीच स्वच्छतेची मोहिम हाती घेतली.